निसर्गाने रडवले; पण ‘महावितरण’च्या देऊळगावराजा उपकार्यकारी अभियंत्यांनी सावरले!

admin 3 Min Read
3 Min Read

– तातडीने हालचाल करून शेतात पडलेले वीज खांब उचलल्याने मिसाळवाडीतील शेतकर्‍यांच्या पेरण्यांचा मार्ग मोकळा!
– मागील आठवड्यातील वादळी वार्‍यामुळे फळबागांसह महावितरणचे मोठे नुकसान
– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र टीम’ने गांभीर्य लक्षात आणून दिल्यानंतर उपविभागीय अभियंता एस.जी. शेटे यांची तातडीची कार्यवाही!

देऊळगावराजा/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – मागील आठवड्यात चिखली व देऊळगावराजा तालुक्यांत वादळी वार्‍यासह पाऊस झाल्याने महावितरणचे विजेचे खांब कोसळून पडले होते, तसेच तारांवर झाडे पडल्याने तारादेखील तुटल्या होत्या. त्यामुळे महावितरणची मोठी हानी होऊन वीज पुरवठाही खंडित झाला होता. तसेच, विजेचे खांब शेतात पडल्याने मिसाळवाडी येथील १० ते १५ शेतकर्‍यांसह मिसाळवाडी शेतशिवारातील अनेक शेतकर्‍यांच्या पेरण्या रखडून पडल्या होत्या. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या वरिष्ठस्तरीय टीमने शेतकर्‍यांच्या प्रश्नांचे गांभीर्य तातडीने महावितरणचे परिमंडळ कार्यकारी अभियंता यांच्यासह देऊळगावराजाचे उपविभागीय उपकार्यकारी अभियंता एस. जी. शेटे यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी मनुष्यबळ कमी असतानाही तातडीने मिसाळवाडी शिवारात मनुष्यबळ पाठवून हे पडलेले खांब उचलले व शेतकर्‍यांच्या पेरण्यांचा प्रश्न मार्गी लावला. दरम्यान, या वादळी पावसामुळे फळबागांसह महावितरणच्या मालमत्तेची मोठी हानी झाली असून, अतिशय विपरीत परिस्थितीतही श्री शेटे यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील वीज पुरवठा सुरूळीत करून पाणी पुरवठा व नागरी वीज पुरवठ्याची समस्या मार्गी लावल्याने नागरिक व शेतकरी त्यांना धन्यवाद देत आहेत.

वादळी वार्‍यामुळे मिसाळवाडी शेतशिवारातील विजेचे खांब शेतात कोसळून पडले होते, तसेच ताराही तुटल्या होत्या. त्यातच पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्‍यांनी पेरण्यासाठी घाई केली होती. परंतु, शेतात विजेचे खांब पडलेले असल्याने पेरण्या कशा करायच्या? असा प्रश्न निर्माण झाला होता. स्थानिक पातळीवर शेतकर्‍यांनी तसेच गावातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी ‘महावितरण’शी संपर्क केला असता, ठेकेदार माणसे पाठवत नसल्याची तक्रार पुढे आली. त्यामुळे मिसाळवाडी येथील उपसरपंच यांच्यासह गावातील जाणकार शेतकर्‍यांनी तातडीने ही बाब ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे मुख्य संपादक तथा मिसाळवाडीचे भूमिपुत्र पुरूषोत्तम सांगळे यांच्यासह ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे संपादकीय संचालक शिवश्री प्रवीण मिसाळ यांच्या कानावर घातली. त्यामुळे याबाबत थेट बुलढाणा परिमंडळाचे मुख्य कार्यकारी अभियंत्यांसह देऊळगावराजाचे उपविभागीय उपकार्यकारी अभियंता एस जी शेटे यांच्याशी संपर्क साधून, त्यांना शेतकर्‍यांच्या पेरण्या वेळेत झाल्या नाही तर शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होईल, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. वास्तविक पाहाता, शहरी वीजपुरवठा सुरूळीत करणे, व वीजेअभावी बंद पडलेला नागरी पाणी पुरवठा सुरूळीत करणे, ही ‘प्रायोरिटी’ श्री शेटे यांच्यासमोर होती. त्यांनी एका दिवसात सर्व यंत्रणा कामाला लावून ही ‘प्रायोरिटी’ मार्गी लावली, व दुसर्‍याच दिवशी मिसाळवाडी शेतशिवारात मनुष्यबळ उपलब्ध करून देत, शेतात पडलेले विजेचे खांब उचलून शेतकर्‍यांच्या पेरण्यांचा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे शेतकर्‍यांनी रखडलेल्या पेरण्या उरकून घेतल्याने मोठे संकट टळले आहे. दरम्यान, वादळी वारे व पावसामुळे फळबागा व महावितरणचे या परिसरात मोठे नुकसान झालेले आहे.


विशेष म्हणजे, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीदेखील याप्रश्नी बुलढाणा कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधून, मिसाळवाडी येथील शेतात पडलेले पोल तातडीने उचलून वीज पुरवठा सुरूळीत करावा, अशी सूचना केली होती. याबाबत ते ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे संपादकीय संचालक शिवश्री प्रवीण मिसाळ पाटील यांच्या संपर्कातही होते. माजी मंत्री तथा माजी आमदार डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनीही तातडीने महावितरणला फोन करून शेतकरीवर्गाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले होते.

Share This Article
Exit mobile version