सततच्या वीज पुरवठा खंडितने साखरखेर्डावासीय वैतागले!

admin 4 Min Read
4 Min Read

– १५ दिवसांसाठी आलेले पाहुणे दोन दिवसांत निघून गेले!
– साखरखेर्डा टाऊन वेगळं करण्याची गरज, प्रत्येक डीटीपीवर एबी स्विचची गरज!
– साखरखेर्डा ते शेंदुर्जन ३३ केव्हीचे काम पूर्ण कधी होणार?

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – पाऊस आला की वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण साखरखेर्डा भागात जास्त वाढले आहे. एकदा वीज पुरवठा खंडित झाला की तो कधी सुरु होईल, हे कोणीच सांगू शकत नाही. अनेक समस्यांनी साखरखेर्डा येथील सबस्टेशन ग्रासले आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालण्याची गरज आहे. अन्यथा, येरे माझ्या मागल्याप्रमाणे रात्रभर चाचपडत नागरिकांना राहावे लागेल. १५ दिवसांसाठी आलेले पाहुणे वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्यांना दोन दिवसांत साखरखेर्डा सोडण्याची वेळ आली.

साखरखेर्डा गावाची लोकसंख्या २५ हजार असून, गावात २९ ट्रान्सफॉर्मर आहेत. तर या ३३ केव्ही सबस्टेशनला ९ गावे जोडणारा आली आहेत. या ९ गावात २८ ट्रान्सफॉर्मर आहेत. अशी एकूण ५७ ट्रान्सफॉर्मर संख्या असून, सर्व ट्रान्सफॉर्मर एकाच टाऊनवर जोडलेली आहे. ५७ पैकी एकाही ट्रान्सफॉर्मरवर बिघाड झाल्यास संपूर्ण वीज वाहक यंत्रणा कोलमडून जाते. नेमका बिघाड कोठे झाला याचा शोध घेण्यासाठी एक एक ट्रान्सफॉर्मर बंद करीत शोध घ्यावा लागतो. याला कधी सहा तास तर कधी १२ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यात मेहकर येथून येणार्‍या ३३ केव्ही लाईनवर सतत बिघाड होत असल्याने त्यात कर्मचार्‍यांना दिवसरात्र एक एक पोल शोधत जावे लागते. साखरखेर्डा ३३ केव्ही सबस्टेशनला मेहकर येथून वीज पुरवठा होतो. पर्यायी वीज पुरवठा करण्यासाठी शेंदुर्जन येथील ३३ केव्ही सबस्टेशनला जोडण्याचे काम चालू आहे. ते अद्याप पूर्ण झाले नाही. नेमकं हेच काम कोणी अडवल की राजकीय वर्चस्वाच्या श्रेयवादासाठी थांबविण्यात आले हेच कळायला मार्ग नाही. राजकीय वर्चस्वाच्या श्रेयवादासाठी साखरखेर्डा येथील नागरिकांना अंधारात खितपत ठेवणे योग्य वाटते का, अशी प्रतिक्रिया जनमानसात उमटू लागली आहे. साखरखेर्डा येथील ३३ केव्ही सबस्टेशनवर तीन फिडर कार्यरत होते. एक गावठाण (टाऊन) , दुसरे ९ गावांसाठी आणि तिसरे कृषीपंपासाठी कार्यान्वित होते. आज गावठाण आणि ९ ग्रामीण भागातील अशा १० गावांसाठी एकच फिडर कार्यरत आहे. साखरखेर्डा टाऊनवर २९ ट्रान्सफॉर्मर (डीपी) तर ग्रामीण भागातील ९ गावात २८ ट्रान्सफॉर्मर (डीपी) आहे. या ५७ पैकी एकाही ट्रान्सफॉर्मरवर बिघाड झाला तर संपूर्ण वीज पुरवठा खंडीत होतो. त्यासाठी प्रत्येक डीपीवर एबी स्विचची गरज आहे. आज एकाही ट्रान्सफॉर्मरवर एबी स्विच नाही, ही वीज वितरण कंपनीची शोकांतिका आहे.

१५ दिवसांसाठी आले आणि दोन दिवसांत निघून गेले!

साखरखेर्डा येथील साखरखेर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक संचालक मधुकर (काका) देशपांडे यांची साखरखेर्डा भागात एक हजारपेक्षा जास्त एकर शेती होती. मुले नागपूर, पुणे येथे स्थायिक झाल्याने भरपूर शेती विकली. काही कूळ कायदा लागल्याने सोडावी लागली. तरीही जी काही शेती आहे. त्यासाठी वर्षातून दोनवेळा ते आपल्या आलिशान बंगल्यात राहायला येतात. गावरान आंबा उतरणीचे काम सुरु आहे. त्याचा हिस्सा त्यांना मिळतो. त्यामुळे ते कुटुंबासह १५ दिवस वास्तव्य करून राहतात. परंतु, साखरखेर्डा येथील खंडित वीज पुरवठ्यामुळे दोन दिवसांत साखरखेर्डा सोडण्याची वेळ आली. साखरखेर्डा येथील नागरिकांनी आणखी किती दिवस हा त्रास सहन करायचा, हे वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी जाहीर करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया बुलढाणा अर्बनचे संचालक किशोर महाजन यांनी व्यक्त केली.


आज साखरखेर्डा भागात चार वीज वितरण कंपनीचे ठेकेदार काम करतात. एकाही ठिकाणी काम व्यवस्थित नाही. कोठे पोल वाकले, तर कोठे पडलेले आहेत. ते सरळ करीत नाही. तुटलेल्या वीज वाहक तार जोडणी करीत नाही. त्यामुळे हा संपूर्ण त्रास होत आहे. अशी प्रतिक्रिया साखरखेर्डा येथील सबस्टेशन वरील कर्मचार्‍यांनी दिली.

Share This Article
Exit mobile version