राज्यपालांनी काही मिनिटांचाच दिला वेळ; प्रश्नच इतके गंभीर की तासभर चालली चर्चा!

admin 4 Min Read
4 Min Read

– राज्यातील महिलांच्या गंभीरप्रश्नी अ‍ॅड.जयश्रीताई शेळके, सुषमा अंधारेंच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
– वैष्णवी हगवणे प्रकरण सीआयडीकडे हस्तांतरित करावे, बेपत्ता महिला व मुलींच्या शोधासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी

मुंबई (धम्मप्रिया कांबळे) – राज्यातील महिलांच्या ज्वलंतप्रश्नी महायुतीच्या महिला नेत्यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची आज भेट घेतली. राज्यपालांनी मोजकाच वेळ दिला होता. परंतु, या महिला नेत्यांनी प्रश्नच इतक्या गांभिर्याने मांडले की तब्बल तासभर चर्चा चालली. याप्रश्नी राज्य सरकारला योग्य ते निर्देश देऊ, अशी ग्वाही राज्यपालांनी दिली. शिवसेना प्रवत्तäया प्रा. सुषमा अंधारे, अ‍ॅड. जयश्रीताई शेळके, माजी महापौर किशोरी पेडणेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या रोहिणीताई खडसे, विद्या चव्हाण, काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड आदींचा सहभाग होता. महिला व मुली बेपत्ता होत असल्याबाबत जयश्रीताई शेळके यांनी गंभीरपणे चिंता व्यक्त करत, याप्रश्नी राज्यपालांचे लक्ष वेधले व राज्य सरकारला या बेपत्ता महिला व मुलींच्या शोधासाठी विशेष मोहीम व विशेष पथक स्थापन्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

आज राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्यासोबत महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. ही बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि आश्वासक ठरली. राज्यपालांकडून आधी मिळालेला मोजका वेळ, मात्र नंतर राज्यातील महत्त्वाच्या विषयांवरची चर्चा पाहता, राज्यपालांनी तब्बल ५५ मिनिटांचा वेळ या भेटीसाठी दिला, व सविस्तर पणे सर्व मुद्द्यांवर महिला शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतले. या बैठकीमध्ये खालील मुद्द्यांवर चर्चा झाली. वैष्णवी हगवणे प्रकरणांमध्ये पोलिस आणि राजकीय वरदहस्त याचा विचार करता, हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावे, तसेच या प्रकरणातील चर्चेत आलेली व्यक्ती म्हणजेच पोलिस अधिकारी जालिंदर सुपेकर तथा त्यांचे सख्खे मेहुणे व पुण्यातील खडक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांचा या प्रकरणातील अतिरिक्त हस्तक्षेप टाळावा, तसेच शशिकांत चव्हाण व जालिंदर सुपेकर यांच्या मालमत्तेची चौकशी व्हावी. लाडकी बहीण योजनेसाठी शासनाने आर्थिक तरतूद निश्चित करावी, मात्र यासाठी सामाजिक न्याय विभाग किंवा आदिवासी कल्याण विभागाचा निधी वळता करू नये. बार्टी, महाज्योती, सारथी या विभागातील संशोधक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना मिळायला हवी. ड्रग्स विरोधी मोहीम अधिक तीव्र व्हावी. राज्यातील बेपत्ता महिला आणि मुलींची वाढती संख्या लक्षात घेता, या बेपत्ता होणार्‍या महिला आणि मुलींच्या शोधमोहिमेसाठी विशेष कक्ष कार्यान्वित व्हावा. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कायद्याचा परिघ ज्ञात असणारी व्यक्ती असावी. आयोगाची रिक्त असणारी सदस्य पदे तात्काळ भरली जावीत. विभागीय कार्यालये सुरू व्हावीत. आयोगाचा राजकीय पक्षपाती दृष्टिकोन टाळण्यासाठी अराजकीय व्यक्तीची नेमणूक व्हावी. या सर्व मुद्द्यांवरील चर्चा ऐकल्यानंतर राज्य सरकारला योग्य ते निर्देश देण्याची ग्वाही राज्यपालांनी या शिष्टमंडळाला दिली. या शिष्टमंडळामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, माजी महापौर किशोरी पेडणेकर, जयश्री शेळके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहिणी खडसे, विद्या चव्हाण, काँग्रेसच्या आमदार ज्योती गायकवाड आदी सहभागी झालेल्या होत्या. प्रदीर्घ चाललेल्या या बैठकीमध्ये राज्यपालांकडून सनदी अधिकारी प्रशांत नारनवरे यांनी मांडलेली भूमिका महत्त्वाची होती. यानिमित्ताने बुलढाण्याच्या लढाऊ महिला नेत्या जयश्रीताई शेळके यांची राज्याच्या राजकारणात महत्वपूर्ण भूमिका पुन्हा एकदा बजावली जात असताना दिसून आली.


भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अंधारे यांनी सांगितलं की, या भेटीमध्ये चाकणकर हा व्यक्तीगत पातळीवरचा विषय नव्हता, त्याचबरोबर इतका छोटा विषय घेऊन राज्यापालांना भेटण्याचं काहीही कारण नाही. जे मुद्दे आम्ही आज या चर्चेवेळी मांडलेले होते. त्यातील सर्वांत महत्त्वाचा पहिला मुद्दा वैष्णवी हगवणे केसमध्ये खूप राजकीय हस्तक्षेप आहे. हगवणे केसमधील ज्या जालिंदर सुपेकरांचं नाव आम्ही वारंवार घेत होतो, आणि त्यांचं पदावनती झाली, त्या जालिंदर सुपेकर यांचे सख्खे मेव्हणे शशिकांत चव्हाण हे खडक पोलिस स्टेशनला पीआय आहेत. शशिकांत चव्हाण यांच्याकडेच हगवणे ज्या चोंधेच्या थार गाडी घेऊन गेले  होते, त्या चोंधेंच्या दोन सुनांच्या केसेस होत्या. याच शशिकांत चव्हाण यांच्या अरबो रूपयांच्या पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी साईट्स सुरू आहेत. त्यामुळे जालिंदर सुपेकर आणि शशिकांत चव्हाण या दोघांची चौकशी करण्यात यावी, याबाबतची चर्चा आम्ही राज्यपालांसोबत केली, अशी माहिती सुषमा अंधारेंनी दिली आहे. त्याचबरोबर वैष्णवी हगवणे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावं. या प्रकरणात जालिंदर सुपेकर आणि त्यांचा मेव्हणा शशिकांत चव्हाण यांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी व्हावी, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याची माहिती यावेळी बोलताना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी दिली आहे. 

Share This Article
Exit mobile version