– ७ जूनपर्यंत मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन; पुढील चार ते पाच दिवस वादळी पावसाचे!
– मान्सून अंदमानात दाखल; अरबी समुद्रासह मालदीव, बंगालच्या उपसागरात प्रवास सुरू!
पुणे (सोनिया नागरे) – राज्यातील शेतकर्यांना हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे. यंदाचा मोसमी पाऊस (मान्सून) अपेक्षेपेक्षा आधी अंदमानात दाखल झाला असून, आज (दि.१५) त्याचे अरबी समुद्रात आगमन झाले. अरबी समुद्रासोबतच मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागातून मान्सून पुढे सरकला आहे. तो येत्या २७ मेपर्यंत केरळमध्ये दाखल होणार असून, महाराष्ट्रात साधारणपणे ७ जूनपर्यंत त्याचे आगमन होईल, अशी शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. म्हणजे, यंदा देशात मान्सूनने पाच दिवस अगोदर हजेरी लावली आहे. भारताच्या दक्षिण किनार्यावर २७ मेरोजी, म्हणजे सामान्यापेक्षा पाच दिवसआधी मान्सूनचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने, भात, मका आणि सोयाबीन यांसारख्या पिकांचे भरघोस उत्पादन होण्याची अपेक्षा वाढली आहे. तसेच, पुढील ४ ते ५ दिवसांत मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेदरम्यान बाहेर पडणे टाळा. झाडांना आश्रय म्हणून घेऊ नका. सुरक्षिततेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहनदेखील हवामान खात्याने केलेले आहे. नैऋत्य मान्सून आज (दि.१५) अरबी समुद्र, मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात पुढे सरकला आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वार्यासह (४०-५० किमी प्रतितास वेग) हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वार्यासह (५०-६० किमी प्रतितास वेग), मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

