– तब्बल ३०० ट्रॅक्टर घेऊन शेतकरी मोर्चात सहभागी; बुलढाण्यातील ट्रॅफिक जाम!
– कर्जमाफी, वीजबिल माफी, पीकविमासह शेतमालाच्या भावावरून शिवसेना नेत्यांचा फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात शेतकर्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवले, पण कर्जमाफीवरून तोंडाला पाने पुसली. पीकविम्याबाबतही शेतकर्यांची फसवणूक केली. शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, वीजबिल माफ करावे, शेतीला संरक्षण म्हणून तार कंपाऊंड द्यावे, शेती मालाला योग्य भाव द्यावा, पीकविमा देण्यात यावा, यासह विविध शेतकरीहिताच्या मागण्यांसाठी शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने आज (दि.२) बुलढाण्यात विराट असा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. तब्बल ३०० ट्रॅक्टर या मोर्चात सहभागी झाले होते. बुलढाण्याची ट्रॅफिक जाम झाली होती. शिवसैनिकांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून सोडले होते. शिवसेना नेत्यांनी याप्रसंगी राज्य सरकारवर घणाघाती टीकास्त्र डागले.
बुलढाणा शहराच्या मध्यवर्ती भागातील राष्ट्रमाता जिजामाता क्रीडा व व्यापार संकुल येथून दुपारी अडीच वाजता तळपत्या उन्हात या मोर्च्याला सुरूवात झाली. मोर्चात सहभागी होण्यासाठी ३०० ट्रॅक्टर बुलढाणा बाजार समिती परिसरात उभे ठेवण्यात आले होते. तिथून हे शेकडो ट्रॅक्टर शिवसेनेचे झेंडे लावून शिस्तीने मोर्चात सहभागी झाले. मात्र यामुळे संगम चौकसह काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांच्या नियोजनाअभावी वाहतुकीवर परिणाम झाला.
शिवसेनेने ट्रॅक्टर मोर्चा काढून ज्या मागण्या रेटल्या आहेत, त्या मागण्यांबाबत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी यापूर्वीच आवाज उठवला आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या आक्रमक आंदोलनातही तुपकर यांनी या मागण्यांवरून सरकारला धारेवर धरले होते. तुपकरांच्याच मागण्या शिवसेना नेत्यांनी या मोर्चात मांडल्या असल्याचे याप्रसंगी दिसून आले.

