– केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले राज्य व केंद्र सरकारच्या विविध पथकांना निर्देश – तब्बल नऊ विभागाचे तज्ज्ञ आज जिल्ह्यामध्ये दाखल; शेगाव परिसरात करणार तपासणी
बुलढाणा (संदीप सावळे) – केस गळती झालेल्या रूग्णांच्या नखांचे विद्रुपीकरण व गळती होत असल्याने या प्रकरणाच्या मुळाशी जावून हा आजार आटोक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून काम करण्याचे निर्देश केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज (दि.२२) केंद्रीय वैद्यकीय पथकाला दिलेत. केंद्र आणि राज्य सरकारचे नऊ विभागांचे तज्ज्ञ आज, दि. २२ एप्रिलरोजी जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहे. या सर्व तज्ज्ञांची आढावा बैठक ना. जाधव यांनी घेतली व सूचना केल्यात.
बुलढाणा जिल्ह्यातील पहुरजिरा, कालवड, कठोरा, भोनगाव, बोंडगाव यांच्यासह शेगाव आणि नांदुरा तालुक्यातील जवळपास १३ गावांमध्ये केसगळतीचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर केस गळती झालेल्या रूग्णांची नखंगळतीही होत असल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाच्या मुळशी जावून शोध घेण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने केंद्र आणि राज्य सरकारचे नऊ विभागांचे तज्ज्ञ आज, दि. २२ एप्रिलरोजी जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहे. या यावेळी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय पथकासोबत आढावा बैठक घेतली व या तज्ज्ञांसोबत चर्चा केली. या आजाराच्या मुळाशी जाऊन योग्य कारणाचा शोध घेवून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना ना. जाधव यांनी संबंधितांना केल्या. तसेच बाधित रूग्णांना यापुढे पुन्हा हानी होणार नाही, याकरिता प्रतिबंधात्मक औषधी उपचार तातडीने करण्याच्या सूचनादेखील यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिल्यात. यामध्ये बैठकीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग, विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, पाणी गुणवत्ता विभाग, जलजीवन मिशन, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली येथील डरमेटोलॉजी विभागाचे वरिष्ठ अध्यापक तज्ज्ञ, अन्नसुरक्षा व मानद प्राधिकरण विभागाचे संचालक, भारतीय गहू व जव संशोधन केंद्र हरियाणा, प्लांट क्वारंटाईन विभाग आणि कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे तज्ज्ञ उपस्थित होते. हे तज्ज्ञ बुलढाणा जिल्ह्यातील केस गळती व नखगळती कुटुंबीयांना व आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना प्रत्यक्षात भेटून तथ्य संकलन करणार आहे. तसेच, उपाययोजना सूचविणार आहेत.