– धनंजय मुंडेचा राजीनामा झाल्याने अजितदादांकडून ओबीसी चेहर्याचीच मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता?
– आ. सुरेश धसांनीही दिले होते मनोज कायंदे यांच्या नावाचे संकेत!
– अजित पवार आता छगन भुजबळ की प्रकाश सोळंकी? कुणाची नाराजी दूर करणार?
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागेवर कुणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुंडे यांच्या जागेवर नाराज असलेले छगन भुजबळ यांना संधी देऊन त्यांची नाराजी दूर करणार का? की दुसरे नाराज असलेले ज्येष्ठ नेते तथा तब्बल पाचवेळा माजलगाव मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे आमदार प्रकाश सोळंकी यांना मंत्रिपद देऊन त्यांची नाराजी दूर करणार? की, वंजारी चेहरा म्हणून तरूण आमदार मनोज कायंदे यांना संधी देणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाला मंत्रिपदाची संधी द्यावी, अशी मागणी सर्वस्तरातून पुढे आली आहे. दुसरीकडे, आ. सुरेश धस यांनीदेखील मनोज कायंदे यांच्या मंत्रिपदाचे संकेत दिले होते. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे राजकारण संपवायचे असेल तर मनोज कायंदे यांना मंत्रिपदाची संधी देऊन ताकद द्यावी, अशी मागणीही अजितदादांच्या पक्षस्तरातून पुढे आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजलगाव मतदारसंघातून अजितदादांचे शिलेदार प्रकाश सोळंकी यांनी दमदार विजय मिळवला होता. पाचवर्षांपूर्वी मंत्रिपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असतानाही त्यांना संधी नाकारली गेली होती. आतादेखील त्यांना मंत्रिपदातून डावलले गेल्याने त्यांचे समर्थक नाराज झाले होते. सलग पाचव्यांदा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे प्रकाश सोळंकी यांना आता मंत्रिपदाची संधी देऊन, त्यांच्यावरील अन्याय अजितदादा पवार दूर करणार का? याकडे आता आ. सोळंकी समर्थकांचे लक्ष लागून आहे. विशेष म्हणजे, २०१९मध्ये मंत्रिपदाचा पत्ता कट झाल्याने नाराज झालेले प्रकाश सोळंकी यांनी थेट विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. परंतु, तेव्हा अजित पवार, जयंत पाटील यांनी त्यांची समजूत काढली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ते अजितदादांसोबत आले आहेत. त्यामुळे त्यांनाच मंत्रिपदी संधी देऊन, अजित पवार हे त्यांची नाराजी दूर करतील, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.
————
देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला!

