– सोयाबीन खरेदी बंद होताच खासगी बाजारात सोयाबीनचे भाव पडले!
– राज्यात अद्यापही २२ ते २५ लाख टन सोयाबीन खरेदीविना पडून
– मुदतवाढ मिळण्याच्या आशेपोटी अद्यापही शेतकर्यांच्या खरेदी केंद्रांवर रांगा
– लातूर व बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन खरेदी!
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्यात नाफेडच्या सोयाबीन खरेदीसाठी शेतकर्यांच्या अजूनही रांगा असल्याने १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे गुरूवारी (ता. ६) केली. सोयाबीन खरेदीची मुदत सायंकाळपर्यंत असताना काल दुपारी चार वाजता हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला. त्यामुळे रात्री बारा वाजेपर्यंत काही ठिकाणी खरेदी केल्यानंतर आजपासून खरेदी बंद झाली आहे. राज्य सरकारच्या मागणीनुसार, केंद्राने सलग दोनवेळा राज्याला सोयाबीन खरेदीची मुदतवाढ दिली, आता पुन्हा सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढीचा प्रस्ताव पणन विभागाने केंद्र सरकारला पाठवला आहे. सर्वाधिक खरेदी लातूर जिल्ह्यातून १ लाख ७३ हजार ८९१ मेट्रिक टन झाली असून, त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातून १ लाख ३२ हजार ७५८ मेट्रिक टन सोयाबीन खरेदी झाली आहे. राज्यात ५२ ते ५५ लाख टन सोयाबीन उत्पादन झाल्याचा अंदाज असून, केंद्र सरकारने जेमतेम १० लाख टन म्हणजे उत्पादनाच्या २० टक्केच सोयाबीन खरेदी केले आहे. तसेच एकूण उत्पादनाच्या ६० टक्केच म्हणजे ३३ ते ३५ टक्केच सोयाबीन बाजारात आले आहे. त्यामुळे अद्यापही राज्यातील शेतकर्यांकडे २२ ते २५ लाख टन सोयाबीन पडून आहे. त्यामुळे सोयाबीनचे करायचे काय? या चिंतेत शेतकरी आहेत. सोयाबीन खरेदी बंद झाल्यानंतर आता बाजारातील सोयाबीनचे दर पाडण्यात आले असून, हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन मागितली जात आहे.
ही योजाना शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापाऱ्यांसाठी?; रविकांत तुपकरांचा हल्लाबोल!
अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होणे बाकी आहे. राज्याचे सोयाबीनचे उत्पादन हे 60 ते 65 लाख मेट्रीक टन आहे. त्यातील सरकार 13 लाख मेट्रीक टन सोयाबीन खरेदी करणार आहे. त्यातील सरकारने फक्त 7 ते 8 लाख मेट्रीक टन सोयाबीन खरेदी केलं आहे. राहिलेलं सोयाबीन आम्ही कुठं फेकायचं? असा सवाल तुपकर यांनी केला आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे की व्यापाऱ्यांसाठी आहे? असा सवालही त्यांनी केला. ज्या संस्थाची अवकात नाही, त्या संस्थाना सोयाबीन खरेदी करण्याचे अधिकार दिले असल्याचे तुपकर म्हणाले. सोयाबीन खरेदी करणाऱ्या संस्थांनी प्रचंड मोठा घोळ घातल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला आहे. यांनी खाली लोकं नेमले आहेत. आचारसंहितेच्या काळात राज्याचे पणन सचिव आणि पणनचे संचालक यांनी घोळ घातला आहे. ज्या संस्थाची औकात नाही, त्यांना सोयाबीन खरेदीचे टेंडर दिले जात असल्याचे तुपकर म्हणाले.
सोयाबीन खरेदीला महिनाभराची मुदतवाढ द्या; नाहीतर उरलेलं सोयाबीन मुंबईच्या समुद्रात नेऊन फेकू!

