वाईट बातमी! ‘लालपरी’चा प्रवास महागला; आजपासून भाडेवाढ!

admin 3 Min Read
3 Min Read

– एसटी महामंडळात १४.९७ टक्के भाडेवाढ; रिक्षा आणि टॅक्सी भाडेही वाढणार!
– फडणवीस सरकारकडून सर्वसामान्य माणसांच्या खिशाला जोरदार कात्री!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सामान्य नागरिकांना दणका देत, त्यांच्या खिशाला जोरदार कात्री लावली आहे. राज्यातील रस्ते वाहतूक दरात बदल करण्यात आले असून, त्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळद्वारे चालविण्यात येणार्‍या बस वाहतूक तिकीट दरात तब्बल १४.९७ टक्के इतकी भाडेवाढ करण्यात आली आहे. ही वाढ इतक्यापुरतीच मर्यादित नाही. तर, मंबई महानगरक्षेत्रातील रिक्षा आणि टॅक्सी दरातही भाडेवाड करण्यात आली आहे. संभाव्य भाडेवाड तीन रूपयांची असणार आहे. आजपासून एसटी बसची भाडेवाढ लागू होईल. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली.

राज्य परिवहन विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्राधिकरणाची बैठक पार पडली. या बैठकीत एसटी तिकीट दरवाढीस मान्यता देण्यात आली. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, वाढलेली महागाई, वाढते इंधन दर यांमुळे एसटीवर जवळपास ३ कोटी रुपयांचा बोजा पडत असतो. अशा वेळी त्यातून मार्ग काढण्यासाठी ही दरवाढ करण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी विशिष्ट दरवाढ करणे अपेक्षित असते, असेही त्यांनी सांगितले. एसटी बसेससोबतच रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता देण्यात आली असून, या दोन्ही वाहनांच्या दरात ३ रूपयांची वाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. दरम्यान, एसटीच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीची भाडेवाढ गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत असल्याने भाडेवाढ दरवर्षी होणे अपेक्षित असते. मात्र मागील ३ ते ४ वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती. त्यामुळे आता एकत्रित १४.९७ टक्के इतकी भाडेवाढ करण्यात आली असून, ती आजपासून लागू होईल. तसेच रिक्षा आणि टॅक्सीच्या दरातही ३ रुपयांची वाढ करण्यात आली असून, तो निर्णय १ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे, अशी माहिती या अधिकार्‍यांनी दिली आहे.


सामान्य प्रवाशांवर होणारा परिणाम पाहता, एसटी महामंडळाच्या प्रस्तावानुसार, भाडेवाढ १४.९७ टक्के म्हणजे सरासरी १५ टक्क्यांची आहे. याचप्रमाणे, ऑटोरिक्षा व टॅक्सी भाडे संघटनांनी मुंबईत ३ रुपयांची दरवाढ करण्याची मागणी केली होती. यामुळे ऑटोरिक्षाचे किमान भाडे २३ रूपये ते २६ रूपये होऊ शकते, तर टॅक्सीचे किमान भाडे २८ रूपये ते ३१ रूपये होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचार्‍यांचे वाढलेले पगार, इंधनाचे वाढीव दर, तसेच सुट्या भागांच्या वाढलेल्या किंमती हे भाडेवाढीचे मुख्य कारण सांगण्यात आले आहे.
————–

तहसीलदार सुरेश कव्हळे रचिला पाया, संतोष काकडे झालेसे कळस!

Share This Article
Exit mobile version