– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत ग्वाही; देशमुख कुटुंबीयांना १० लाखांची मदत जाहीर!
– बीडच्या पोलिस अधीक्षकांची उचलबांगडी; बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी विशेष मोहीम राबविणार!
– मस्साजोग सरपंचांच्या नृशंस हत्याकांडाबद्दल फडणवीस यांनी सभागृहात केले विस्तृत निवेदन
नागपूर (स्वाती ठाकरे) – बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अतिशय निर्घृण हत्येप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन करत, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची पाळेमुळे खोदून काढण्याची महत्वपूर्ण घोषणा केली. सरपंच संतोषबापूंच्या हत्येप्रकरणाची एसआयटी व न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. ही चौकशी ३ ते ६ महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, असे सांगून याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणार्या बीड पोलिस अधीक्षकांची बदली करण्यात आल्याचेही यावेळी त्यांनी सभागृहाला सांगितले. तसेच, मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई म्हणून १० लाख रुपयांची मदत करण्याचीही घोषणा केली. कोण कुणाच्या जवळचा आहे, याचा अजिबात विचार न करता कारवाई होईल. वाल्मिक कराडचा एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. दुसर्या प्रकरणात संबंध आढळल्यास कारवाई करू, अशी घोषणाही फडणवीस यांनी केली. हे प्रकरण या घटनेपर्यंत मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळेमुळे खोदावी लागतील. त्यातून बीड जिल्ह्यात ज्या प्रकारे ‘लॉलेसनेस’ची (अराजकाची) परिस्थिती पहायवास मिळत आहे, ती परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल. त्यासाठी लवकरच व्यापक कारवाईची मोहिम हाती घेत आहोत, असेही फडणवीस म्हणाले.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या नृशंस हत्येचा मुद्दा आमदारांनी मांडला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सरकारची बाजू मांडली. फडणवीस यांनी या घटनेचा घटनाक्रम सांगत मास्टरमाइंडवर कारवाई होणार असल्याची ग्वाही सभागृहात दिली. बीडमधील मस्साजोगचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली येथपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळमुळे खोदावी लागतील. बीड जिल्ह्यामधील कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती पाहायला मिळत आहे, ती परिस्थिती संपवावी लागेल, असे सांगून फडणवीस यांनी सरपंच संतोषबापूंच्या हत्येचा घटनाक्रम सभागृहात सांगितला. ”मस्साजोग येथे अवादा कंपनीनचे ऑफिसजवळ ६ डिसेंबरला १२.२० च्यादरम्यान अशोक नारायण घुले, सुदर्शन घुले, प्रतिक घुले हे आरोपी त्या ठिकाणी गेले. तिथला वॉचमन अमरदीप भगवान सोनवणे याला शिवागाळ आणि मारहाण केली. त्यानंतर सीनिअर प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजीराव थोपटे त्या ठिकाणी आले, त्यांनाही मारहाण केली. मारहाण चालू असताना सरपंच संतोष देशमुख यांना फोन केला. बाजूच्या गावाचे मारहाण करत असल्याने देशमुखांसोबत काही लोक तेथे आले. या सर्वांना त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी या सगळ्यांना चोप दिला. त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. घुले दादागिरी करत होते त्यांना मार खावा लागला. त्यानंतर ९ डिसेंबरला संतोष देशमुख हे चारचाकी वाहनातून गावी जात होते, त्यावेळी ते एकटेच होते. पेट्रोलपम्पावर त्यांचे आतेभाऊ तिथे दिसले आणि त्यांना बोलावत सोबत घेतले. संतोष देशमुख हे बाजूच्या सीटवर बसले आणि आतेभाऊ गाडी चालवत होता. टोल नाक्यावर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आणि त्यामागे आणखी एक गाडी त्यांची वाट पाहत होती. रस्त्यात संतोषबापूंची गाडी अडविल्यावर पहिल्यांदा त्यांनी ड्रायव्हरबाजूची काच फोडली, त्यांना वाटले तेच गाडी चालवत होते. मात्र ते बाजूला असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी दुसर्या बाजूला जात त्यांना बाहेर घेत स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकले. बराचवेळ आरोपी गाडीमध्ये मारहाण करत होते. त्यांच्याकडे कम्पाउंडच्या तारा होत्या त्या तारांनी मारहाण करण्यात आली. गाडीमध्ये खाली उतरवूनही मारहाण केली. जेव्हा आरोपींच्या लक्षात आले की संतोष देशमुख हे आता जीवंत नाहीत, त्यावेळी आरोपी सोडून पळाले. या सर्व प्रकरणात सातत्याने सरपंचांचा भाऊ हा या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या संपर्कात होता. विष्णू चाटे त्यांना २० मिनिटांत सोडतो, १५ मिनिटांत सोडतो असे सांगत होता. पण त्यांनी त्याला सोडले नाही. त्यांनी संतोष देशमुख यांना प्रचंड मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा अत्यंत दुर्देवी प्रकारचा मृत्यू आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. कारण देशमुख हत्या प्रकरणात जे आरोपी सापडले आहेत ते सर्व आरोपी धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड याच्या संपर्कातील आहेत. तसेच कराड याच्यावर दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचाही गुन्हा दाखल आहे. या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या काळात सभागृहात येणारे धनंजय मुंडे हे मागील दोन दिवसांपासून मात्र विधिमंडळाकडे फिरकलेच नाहीत. मुंडे यांच्या गैरहजरेची आता सर्वपक्षीय आमदारांमध्ये चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. सत्ताधारी महायुतीतील भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
सरपंच संतोष देशमुख यांचे डोळे जाळण्यात आले नाही. त्यांच्या डोळ्यावर मारहाण करण्यात आली. पण ही घटना अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी काहीजण उशिरा गुन्हा दाखल झाल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. ६ तारखेच्या घटनेची प्रोजेक्ट इंजिनिअर शिवाजी थोपटे यांनी फिर्याद दिली होती. त्यात त्यांनी स्वतःला मारहाण केल्याची तक्रार केली होती. त्यानंतर ४ दिवसांनी अतिरिक्त फिर्याद अमरदीप सोनवणे यांची दिली. सोनवणे हे मागासवर्गीय असल्यामुळे अॅट्रोसिटी दाखल करण्यात आली. या प्रकरणी गत २९ नोव्हेंबर रोजीही एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्यांची एकमेकांशी संबंध आहे. याची चौकशी केली जाईल. मी सभागृहाला आश्वस्त करतो की, या ग्ाुन्ह्याचा मास्टरमाइंड कुणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री म्हणाले, वाल्मिक कराडचा एका गुन्ह्यात हात असल्याचे स्पष्ट आहे. त्याच्यावर कारवाई होईलच. पण या गुन्ह्यातही त्याच्याविरोधात पुरावे आढळले, तर त्याच्यावरही तो कोणत्या पक्षाचा आहे, कुणाचा सहकारी आहे, त्याचे कुणासोबत फोटो आहेत, याचा विचार न करता कारवाई केली जाईल. कारण, बीड जिल्ह्यात ज्या प्रकारे अराजकाचे राज्य तयार करण्याचा प्रयत्न होत आहे, विशेषतः काही सदस्यांनी सांगितले की, कुणावरही ३०७ लावायच्या, कुणावरही वेगवेगळ्या केसेस लावायच्या हे अतिशय चुकीचे घडत आहे. यात पोलिस प्रशासनाचाही दोष आहे. पोलिसांनी या प्रकरणी वस्तुस्थिती तपासून कारवाई केली पाहिजे. यापुढे असे प्रकार सहन केले जाणार नाही. बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कारवाया करणार्यांची पाळेमुळे आम्ही खोदून काढू. त्यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल होईलच. पण त्यांच्यासोबत काम करणार्या लोकांवरही मकोका अंतर्गत लावण्यात येईल. या घटनेशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे संबंध असणार्या प्रत्येकावर त्यांनाही संघटित गुन्हेगारी समजून मकोकाअंतर्गत कारवाई केली जाईल. बीड जिल्ह्यातील वाळूमाफिया, भूमाफिया आणि वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणार्या लोकांविरोधात एक मोहीम हाती घेऊन या सर्वांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई केली जाईल”, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला दिले.
विरोधकांचा सभात्याग
मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदन केल्यानंतर या विषयावर बोलण्याची परवानगी विरोधकांनी मागितली. मात्र सभापती राहुल नार्वेकरांनी या चर्चेमध्ये नियमानुसार उत्तर देण्यासाठी परवानगी देता येणार नाही असं विरोधकांना सांगितलं. त्यामुळे निषेध म्हणून विरोधकांनी सभात्याग केला.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींचे एन्काऊंटर करणार्यांना माढ्यातील शेतकर्यांने ५१ लाख रुपयांची बक्षिसाची घोषणा केली आहे. शेतकर्याच्या या घोषणेने खळबळ उडाली आहे. माढ्यातील शेतकरी कल्याण बाबर (वय ४५ रा वडशिंगे, ता. माढा, जि. सोलापूर) यांनी ही घोषणा करताना तसे प्रतिज्ञापत्र केले आहे. हे प्रतिज्ञापत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवणार असल्याचेही कल्याण बाबर यांनी जाहीर केले आहे.
—————

