– १५ हजार हेक्टरवरील सोयाबीन, कापूस पीक हातचे गेले!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्याला काल दि.१८ व आज दि. १९ ऑक्टोबररोजी पुन्हा एकदा पावसाने झोडपले. वादळी पाऊस बरसल्याने बरेच शेतकर्यांच्या सोयाबीन सुड्या भिजल्या तर काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसाने जवळपास १५ हजार हेक्टरवरील कापूस, सोयाबीन, मका व इतर पिकांचे नुकसान केले आहे.
विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम, उत्तर महाराष्ट्रातील 50 लाख हेक्टरवरील मका, सोयाबीन, कापूस ही पिके अतिवृष्टीमुळे नष्ट झाली आहेत. परतीचा पाऊस शेतीच्या मुळावर उठला आहे. फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. सरकारने संवेदनशीलतेने तातडीची मदत देवून संकटग्रस्त शेतकर्यांचे अश्रू पुसावेत.
आज दि. १९ ऑक्टोबररोजी संध्याकाळी तर खामगाव तालुक्यातील हिंगणा कारेगाव, पिंपरी गवळी, पळशी, लोणी, चितोडा, शिरला नेमाने आंबेटाकळी तसेच मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा, नायगाव देशमुख, पारखेड, पाथर्डीसह जिल्ह्यातील इतरही भागात वादळी वारा व विजांसह जोरदार पाऊस बरसला. तरी वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. देऊळगाव साकरशा येथील खामगाव रोडवरील विद्युत रोहित्रावर वीज पडल्याने सदर रोहीत्र जळाले. त्यामुळे बसथांबा परिसरातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागणार आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करीत होते. यासह चिखली तालुक्यातील बहुतांश गावात पाऊस झाला असून, शेतीपिकांच्या नुकसानीसह वीज पुरवठाही खंडित झाला होता.
——-

