– गणवेश मिळताच रिक्षाचालकांच्या चेहर्यावर फुलले हास्य!
पुणे – हातात नवा कोरा गणवेश आणि रिक्षा चालविताना दाखविलेल्या प्रामाणिक सेवेबद्दल झालेले तोंडभरून कौतुक आणि अगदी आपुलकीने दिलेले स्नेहभोजन या अनोख्या सन्मानाने काल (दि.२९) दक्षिण पुण्यातील रिक्षाचालक बंधु व भगिनी चांगल्याच सुखावल्या, आणि त्यांच्या चेहर्यावर प्रसन्नतेचे हास्य उमटले. निमित्त होते कार्यसिद्धी प्रतिष्ठाण, कात्रजच्यावतीने आयोजित रिक्षाचालकांना गणवेश वाटप व विविध योग ग्रूप यांना टी-शर्ट वाटप सोहळ्याचे! कार्यसिद्धी प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष गिरीराज तानाजीराव सावंत यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्त या कार्यक्रमाचे दुर्वांकुर मंगल कार्यालय, धनकवडी (पुणे) येथे आयोजन करण्यात आले होते. ‘दातृत्व हे वंशाच्या पुण्याईने मिळते हे खरे आहे; पण ते स्वकर्तृत्वानेच सिद्ध करावे लागते. समाजमन, समाजहित जाणून घेऊन यापुढेही आम्ही कार्य करत राहू. आपले ऋणानुबंध मिटणारे नाहीत’, असे उद्गार याप्रसंगी गिरीराज सावंत यांनी काढले.
याप्रसंगी बोलताना गिरीराज सावंत म्हणाले, की ‘आजचा हा अभीष्टचिंतन सोहळा; रिक्षाचालक बांधवांना गणवेश वाटप तसेच विविध योग ग्रूपच्या सदस्यांना टी-शर्टचे वाटप हा कार्यक्रम म्हणजे कार्यसिद्धी प्रतिष्ठाणच्या सामाजिक चळवळीत माझ्यासोबत काम करणार्या माझ्या सहकार्यांनी मला दिलेले वाढदिवसाचे अनोखे गिफ्ट आहे. त्याबद्दल मी या सहकार्यांचा ऋणी आहे. समाजमन आणि समाजहित जाणून कार्यसिद्धी प्रतिष्ठाण कार्यरत आहे. आम्ही लोकांच्या हितासाठी यापुढेही अहोरात्र असेच काम करत राहू. रिक्षा व्यवसाय व या व्यवसायातील रिक्षाचालक बांधवांची भूमिका ही केवळ व्यवसायापुरती नाही तर, ती समाजातील एक महत्वपूर्ण कडी आहे. आम्ही तुम्हाला ही वर्दी, गणवेश दिला. हा काही वर्षानंतर तो फाटेल, खराबही होईल, त्याच्यावरील आमच्या नावाची अक्षरेही पुसली जाईल; पण यानिमित्ताने तुमचे आणि आमचे जे ऋणानुबंध निर्माण झाले आहेत, ते कधीही संपणारे नाहीत. आपण देण्याघेण्याने नाही तर हृदयाने एकमेकांशी जोडले गेलो आहोत. दातृत्व हे वंशाच्या पुण्याईने लाभते, हे खरे आहे; पण ते कर्तृत्वानेच सिद्ध करावे लागते. विविध समाजहिताचे उपक्रम राबविताना, आणि गोरगरिबांच्या सेवेसाठी काम करताना, आम्हाला जे तुमचे आशीर्वाद लाभत आहेत, त्याचे मूल्य करता येणारे नाही. सामाजिक काम करणार्या अनेक संघटना, संस्था आहेत. पण खर्याअर्थाने समाजाचे हित आणि गरज ओळखून काम करणारी ‘कार्यसिद्धी’ ही एकमेव संस्था आहे. आम्ही समाजाच्या हितासाठी यापुढेही नेटाने काम करतच राहू’, असेही गिरीराज सावंत यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच, वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणार्या सर्व मान्यवरांचे ऋण व्यक्त केले.
या बहारदार कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कुमार पाटील यांनी केले, तर उपस्थितांचे आभार आतीष जाधव यांनी मानले. या कार्यक्रमास कात्रज परिसरातील रिक्षाचालक बंधु-भगिनी, भ्रमंती ग्रूपचे पदाधिकारी व सदस्य, चैतन्य हास्य ग्रूप, श्रीराम योगसाधना ग्रूपसह विविध योग ग्रूप, अमर देशमुख, कृष्णा जाधव, सनी काळे, अनिकेत हिप्परगीकर, आशीर्वाद शिंदे, संजय शिंदे, आतीष जाधव, अजय हांडे, मंगेश भोसले, सागर खुटवाड, संग्राम थोरात,बालाजी उज्वनकर, तुपे सर, गौरव जगताप आदींसह बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.
———–

