सिंदखेडराजा (अनिल दराडे) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी कालपासून मातृतीर्थ सिंदखेडराजात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सोयाबीन-कापूस दरवाढ, पीकविमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची १०० टक्के नुकसान भरपाई, शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकर्यांच्या मागण्यांसाठी तुपकर अन्नत्याग करीत आहेत. हे आता आंदोलन व्यापक होण्याची चिन्हे दिसत आहेत. तुपकर यांची हटके आंदोलनाची स्टाईल पाहता, तुपकर आता पुढे नेमका काय पवित्रा घेणार याकडे शेतकर्यांसह प्रशासनाचे, पोलीस यंत्रणांचेदेखील लक्ष लागून आहे. तुपकर यांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी राज्य सरकारच्यावतीने मध्यस्थी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या नेतृत्वात प्रशासनाचे शिष्टमंडळ तुपकरांना भेटले. यावेळी तुम्ही पीकविमा कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा का दाखल करत नाही, असा सवाल तुपकरांनी केला. आधी गुन्हा दाखल करा, मगच माझ्याकडे या, असेही तुपकरांनी ठणकावले.
आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे शेतकर्यांचे लक्ष!
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाची आज मुंबईत बैठक होत आहे. यात शेतकरीप्रश्नी तोडगा निघण्याची शक्यता असून, शेतकर्यांना पीकविमा रक्कमदेखील तातडीने दिली जाणार आहे. परंतु, याचे श्रेय रविकांत तुपकरांना भेटणार नाही, याची काळजी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार हे घेत असल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. रविकांत तुपकर यांना विधानसभा निवडणूक लढायची असून, ते सिंदखेडराजा मतदारसंघातून उभे राहू शकतात. त्यामुळेच त्यांनी अन्नत्याग आंदोलनासाठी सिंदखेडराजाची निवड केली आहे. ते भूमिका शेतकरीहिताची मांडत असले तरी त्याआडून सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघात आपला खुटा हलवून बळकट करत आहेत. तुपकरांचा हा सुप्त हेतू सफल होणार नाही, यासाठी शेतकरीहिताच्या मागण्या या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मान्य करण्याचे नियोजनही सरकार पातळीवर चालू असल्याची खात्रीशीर माहिती वरिष्ठस्तरीय सूत्राने दिली आहे. त्यासाठी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज भल्यापहाटे जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचेही कळते आहे. त्यामुळे शेतकरीप्रश्नी राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे आता शेतकर्यांचे लक्ष लागून आहे.
मराठा आरक्षण, शेतकरीप्रश्नी मनोज जरांगे पाटलांशी राज्य सरकारची भल्यापहाटे चर्चा!

