– शेवगाव-पाथर्डीतून जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांची जोरदार दावेदारी; आ. राजळेंसमोर जबरदस्त पक्षांतर्गत आव्हान!
शेवगाव/नगर (बाळासाहेब खेडकर) – आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विविध राजकीय पक्षांचे इच्छुक नेते कामाला लागले असतानाच, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरूण मुंडे यांनी उमेदवारीसाठी दावा करून शनिवारी (दि.२४) भव्य निर्धार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मात्र भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना टाळून हा मेळावा होत असल्याने पक्षाची गटबाजी ऐन निवडणुकीच्या तोंडावर चव्हाट्यावर आली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडून, उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
बैठकीस भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर, शिवसंग्रामचे नवनाथ इसरवाडे, राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष गोवर्धन शेळके, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते जिल्हा उपाधक्ष बाळासाहेब कोळगे, तालुका चिटणीस बाळासाहेब डोंगरे, भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल सागडे, तालुका सरचिटणीस गुरुनाथ माळवदे, विलास फाटके, संजू टाकळकर, नगर अध्यक्ष विनोद मोहिते, जिल्हा चिटणीस गणेश कराड, नगरसेवक अजय भारस्कर, विकास फलके, शब्बीर शेख, दिगंबर कढवते, अंकुश कुसळकर, अर्जुन ढाकणे, शाम कनघरे, पप्पू केदार यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यासाठी गावोगावी डिजिटल फलक लावण्यात आले असून, सदर फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आ. पंकजा मुंडे, ना.राधाकृष्ण विखे, माजी खा. सुजय विखे, आ.राम शिंदे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शेवगाव तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, पाथर्डीचे गोकुळ दौंड या मातब्बर नेत्याचे फोटो झळकत आहेत. मात्र विद्यमान आ. मोनिका राजळे यांचा फोटो या डिजिटल फलकावर डावलण्यात आला आहे. त्यामुळे भाजपतील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. त्यामुळे मतदारसंघात खळबळ निर्माण होऊन उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे त्यांच्याविरोधात अरूण मुंडे यांनी उघडपणे दंड थोपटले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी याबाबत काय भूमिका घेतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष केंद्रित झाले आहे. आ. मोनिका राजळे गत दोन पंचवार्षिक निवडणुकीपासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. परंतु भाजपचे मूळ निष्ठावान माजी मंत्री आ. पंकजा मुंडे समर्थकांना सातत्याने डावलण्यात येत असल्याचे मुंडे समर्थकांचे म्हणणे आहे. विकास कामे करतानाही भेदभाव केला जातो. मूळ निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना डावलून वैयक्तिक राजळे यांचे समर्थकांना विकासकामात नेहमी प्राधान्य दिले जाते. प्रत्येक ठिकाणी असाच प्रकार घडत असल्याने मूळ निष्ठावान भाजप कार्यकर्ते त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांना सामावून घेतले जात नाही. काही महिन्यांपूर्वी झालेल्या तालुकाध्यक्ष पद निवडी बाबतही असेच केले गेले. त्यामुळे पक्षश्रेष्ठीकडे दाद मागून निष्ठावान असलेल्या तुषार वैद्य यांची निवड करण्यास भाग पाडले. पक्षात असेच चालू राहिले तर याचा फटका पक्षाला बसत असून, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आ. राजळे यांचे कट्टर समर्थक असलेल्या अनेक गावातील सरपंचांच्या गावातून भाजप उमेदवार डॉ.सुजय विखे हे पिछाडीवर राहिले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतील आ.राजळे व त्यांच्या समर्थकांची भूमिका ही संशयास्पद वाटते. आ.राजळे यांच्याबद्दल मतदारसंघातही सध्या नकारात्मक वातावरण आहे. भाजपने केलेल्या सर्वेक्षणातही नकारात्मक अहवाल आल्याचे कळते आहे. पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिल्यास येथे भाजपचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे श्रेष्ठींनी भाकरी फिरवावी, मतदारसंघातून अरूण मुंडे यांना उमेदवारी द्यावी, अशी मेळावा मागणी नियोजनाच्या बैठकीत भाजपच्या पदाधिकार्यांनी केलेली आहे.
—————

