पुणे (विशेष प्रतिनिधी) – पुणेस्थित अखिल महाराष्ट्र विश्वकर्मा सुतार समाज महासंघाच्या काही पदाधिकार्यांनी उपमुख्यमंत्री तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून राज्यातील सर्व सुतार समाज बांधवाच्यावतीने महायुतीला पाठिंबा जाहीर केला. वास्तविक पाहाता, असा निर्णय जाहीर करण्यापूर्वी फडणवीस यांच्याकडे गेलेल्या या सहा-सात टाळक्यांनी समाजाला अजिबात विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळे त्यांच्या या हलकटपणावर तीव्र संतापाची लाट उसळली असून, काही समाज बांधवांनी थेट फडणवीस यांना मेसेज पाठवून या टाळक्यांमागे समाज नाही, आम्ही कुणाला मतदान करायचे, याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत, असे कळवले आहे. त्यामुळे समाजाचे ठेकेदार म्हणून मिरवण्यास गेलेले हे टाळके चांगलेच थोबाडावर आपटले आहेत.
“हनुमंत पांचाळ व त्यांचे सहकारी म्हणजे अख्खा सुतार समाज आहे का? यांनी समाजाची ठेकेदारी करण्याची गरज काय होती? सुतार समाजातील प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असून, लोकसभा निवडणुकीत कुणाला मतदान करायचे, याचा निर्णय तो स्वतः घेईल. फडणवीस यांच्याकडे गेलेल्या अनेकांना समाजात कुणीही ओळखत नसून, विचारतही नाही. त्यांनी फडणवीस यांच्यासमोर असा शहाणपणा करण्याची काय गरज होती? असा संतप्त सवाल राज्यातील ज्येष्ठ संपादक व उद्योजक पुरूषोत्तम सांगळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित केला आहे. या टाळक्यांनी जाहीर केलेला पाठिंबा म्हणजे समाजाचा पाठिंबा नाही, असे मेसेजही फडणवीस यांना पाठविण्यात आले आहे. समाजातील स्त्री-पुरूषांना ज्याला योग्य वाटेल त्याला ते मतदान करतील, असेही फडणवीस यांना कळविण्यात आल्याने समाजाच्या पाठिंब्याचा फार्स करणारे हे तथाकथित नेते चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

