संततधार पावसाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनाने सतर्क रहावे!

editor 3 Min Read
3 Min Read
  • खरीप खरीप पिकाचे नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करावेत
  • गोगलगाय प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जमा करावी
  • बॅरेज मध्ये अतिरिक्त पाणी साठवून जमीन व पिकाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी

लातूर (जिल्हा प्रतिनिधी) :  मागच्या चार दिवसापासून लातूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे.  त्यामुळे नुकतीच पेरणी झालेल्या खरीप पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे, शिवाय पडझड व इतर दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी, पाणी साचलेल्या भागात पाहणी करून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना माजी मंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत.

लातूर जिल्ह्यात मागच्या चार दिवसापासून सूर्यदर्शन झालेले नाही. सातत्याने संतंतधार पाऊस सुरू आहे.  कालपासून पावसाचा जोर आणखीन वाढला आहे. या परिस्थितीत पडझडीच्या घटना घडण्याची शक्यता आहे.  त्याचबरोबर सखल भागात पाणी साचून खरिप पिकाचेही नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून जिल्ह्यातील सध्य परिस्थितीबाबत चर्चा केली,  त्यांच्याकडून आढावा घेतला,  प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून राहण्याची सूचना केली,  आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचनाही याप्रसंगी त्यांनी केल्या आहेत.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांनीही जिल्ह्यातील सद्यस्थितीबद्दल आमदार अमित देशमुख यांना माहिती अवगत केली आहे,  सध्या पडणारा पाऊस जोराचा नसला तरी काल दिवसभरात काही ठिकाणी ३९ ते ८० मिलिमीटर पाऊस झाला आहे,  त्यामुळे नदी-नाले प्रवाही झाले आहेत. पाऊस असाच चालू राहिला तर पूर परिस्थिती उद्भवू शकते ही बाब लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्जत ठेवण्यात आली आहे,  कोणतेही धरण भरलेले नसल्यामुळे तेथून विसर्ग करण्यासारखी परिस्थिती नाही .  खरीप पिकाचे अद्याप नुकसान झाले नसले तरी महसूल यंत्रणेने याबाबत आवश्यकतेनुसार पंचनामे करून माहिती जमा करावी अशा सूचना दिल्या आहेत.  अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार देशमुख यांना दिली आहे,

गोगल गाईच्या प्रादुर्भावा बाबत माहिती घ्यावी
गोगलगायच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या पिकाचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी माजी मंत्री आमदार देशमुख यांच्याकडे आल्या आहेत,  याबाबत माहिती घेऊन त्याचे पंचनामे करावेत अशी सूचना त्यानी जिल्हा प्रशासनाला केली आहे,  कृषी विभागाकडून यासंदर्भात माहिती मागवण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार देशमुख यांना सांगितलेआहे. सततच्या पावसामुळे जिल्हात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे,  त्यामुळे नदीकाठच्या गावकऱ्यांना सतर्क करावे,  बॅरेज मध्ये पाणी थांबून शेत जमिनींचे नुकसान होणार नाही यासाठी पाटबंधारे विभागाला सतर्क राहण्यास सांगावे आदी सूचनाही आमदार अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या असून याबाबत सर्वतोपरी काळजी घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले आहे.

Share This Article
Exit mobile version