आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : केंद्र आणि राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी “आयुष्मान भव” मोहीमे अंतर्गत ग्रामीण रुग्णालय आळंदी येथे भव्य आरोग्य मेळावा उत्साहात आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन रुग्ण कल्याण समितीचे सदस्य पांडुरंगशेठ गावडे यांचे हस्ते झाले.
मेळाव्यात वैद्यकीय तज्ञ, स्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ,अस्थी रोग तज्ञ,शल्य चिकीत्सक, नाक कान घसा तज्ञ,नेत्र रोग तज्ञ, दंत चिकित्सक इ सेवांच्या तज्ञ डॉक्टर्सनी उपस्थित राहून आरोग्य सेवा दिल्या. या मेळाव्यात ९४८ रुग्णांची तपासणी आणि उपचार करण्यात आले. “निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे” या संकल्पने अंतर्गत २५२ रुग्णाचे १८ + पुरुषांची तपासणी आणि उपचार करण्यात आले. यातील सहा रुग्णांना संदर्भ सेवा देण्यात आली. या शिवाय सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अवयव दान शपथ घेण्यात आली आणि अवयव दान करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या एकूण २० अधिकारी आणि कर्मचारी यांचे स्वेच्छेने ऑनलाईन फॉर्म भरण्यात आले. या मेळावा उपसंचालक डॉ राधाकिशन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागनाथ येमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.

