– तळेगाव दाभाडे भागातील आंबी येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटेच राहात होते!
पुणे (सोनिया नागरे) – एका देखण्या, राजबिंड्या मराठी अभिनेत्याचा अत्यंत धक्कादायक असा शेवट झाला आहे. पत्नी व मुलगा सोबत राहात नसल्याने वयाच्या ७७ व्यावर्षी या एकेकाळी गाजलेल्या अभिनेत्याला अतिशय दुर्देवी मरणाला सामोरे जावे लागले. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे धक्कादायक निधन झाले असून, पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरातील आंबी एमआयडीसीनजीक असलेल्या एका सोसायटीतील प्लॅटमध्ये त्यांचा चेहरा काळा पडलेला मृतदेह आढळून आला. मृतदेह आज आढळला असला तरी, महाजनी यांचे निधन दोन ते तीन दिवसांपूर्वी झाले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली. तसेच, हा प्रकारही संशयास्पद असल्याने पोलिस अधिक तपास करत आहेत. महाजनी यांच्या निधनामुळे मराठी चित्र आणि नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली असून, विविध मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. महाजनी यांच्या पार्थिवावर मुलगा गश्मीर याने नवी पेठे येथील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पुणेकरांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
पुण्यातील तळेगाव आंबी एमआयडीसी भागात रवींद्र महाजनी हे एका फ्लॅटमध्ये भाडेतत्वावर राहात होते, तर त्यांचा अभिनेता मुलगा व पत्नी मुंबईत राहतात. मराठीतील विनोद खन्ना अशी ओळख असणारे प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी यांनी ७७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. शुक्रवारी शेजार्यांनी रविंद्र महाजनी राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती तळेगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, महाजनी राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी पोलिसांना रविंद्र महाजनी यांच्या मृतदेह आढळून आला. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस तपासात व्यक्त केला जात आहे. महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर महाजनी हा आईसह मुंबईत राहतो. पोलिसांनी त्याला सर्व माहिती दिल्यानंतर तो तात्काळ पुण्यात दाखल झाला.
महाजनी यांच्या पार्थिवावर नवी पेठे येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा यांचा जन्म बेळगाव येथे झाला असून, त्यांचे बालपण मुंबईत गेले. ”झुंज” हा त्यांचा पहिला चित्रपट १९७४ मध्ये प्रदर्शित झाला. महाजनी यांचा ”मुंबईचा फौजदार” व देवता हे चित्रपट तुफान गाजला. त्यांनी दिग्दर्शक, निर्माता म्हणूनदेखील काम केले. ते बांधकाम व्यवसायातदेखील उतरले होते. परंतु, त्यांनी तेथे फसवणूक झाल्याने ते कर्जबाजारी झाले होते. लक्ष्मी, गोंधळात गोंधळ, हळदी कुंकू हे चित्रपटही प्रेक्षकांना भावले होते. गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून ते आंबी (ता. मावळ) येथे एकटेच येथे राहत होते. रवींद्र महाजनी हे गेल्या सात ते आठ महिन्यापासून घरात एकटेच राहत होते. त्यांना कोणी भेटायला येत नव्हतं. ते सुद्धा खुप कमी लोकांशी बोलत असत. अशी माहिती शेजारी राहणाऱ्या प्राजक्ता पुजारी यांनी दिली आहे.

