– तातडीने दुरूस्ती प्रमाणपत्रे द्या, अन्यथा तीव्र आंदोलन, अभाविपचा कुलगुरूंना इशारा
आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील आळंदी संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले २०२१ -२२ पास आऊट झालेल्या २५० विद्यार्थ्यांचे नुकसान करणारी अतिशय गंभीर चूक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून झाली आहे. या विद्यार्थ्यांनी संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असून, विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र मात्र स्थापत्य अभियांत्रिकीचे देण्यात आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
कुलगुरू सुधीर गोसावी यांच्याकडे निवेदन देऊन प्रमाणपत्रात चूक दुरुस्ती करून मिळावी, अशी मागणी महाविद्यालयीन मुलांनी केली. यावेळी अभाविपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री आनंद भुसनर, पिंपरी चिंचवड महानगर सहमंत्री बाळासाहेब सोलकर, विद्यापीठ अध्यक्ष महादेव रंगा, नगर मंत्री चिराग मोडक, सौरभ डागंडा आदी उपस्थित होते. या विद्यापीठाच्या गजब कारभारामुळे विद्यार्थी पालक त्रस्त आणि संभ्रमात पडले असून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पिंपरी चिंचवडच्यावतीने या प्रश्नाला वाचा फोडण्यात आली आहे. एमआयटी महाविद्यालया तील प्राचार्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. चर्चा केल्यानंतर त्यामध्ये महाविद्यालयाची कोणत्याही प्रकारची चूक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात पूर्णपणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासन जबाबदार आहे. या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र दुरुस्त करून येत्या ४ दिवसात देण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. या दुरुस्ती नंतर पदवी प्रमाणपत्राचे कोणतेही शुल्क घेऊ नये, अशीही मागणी करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना येत्या चार दिवसांत न्याय न दिल्यास या प्रश्नासाठी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात येईल, असा खणखणीत इशारा अभाविप प्रदेश सहमंत्री आनंद भुसनर यांनी दिला आहे.
————

