अलंकापुरीत इंद्रायणी नदीला जलप्रदूषणाचा विळखा!

editor 2 Min Read
2 Min Read

अर्जुन मेदनकर
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने व नदी प्रदूषणाने अपवित्रतेचे ग्रहण लागले असून, नदीला जलप्रदूषणासह जलपर्णीचा विळखा पडला आहे. इंद्रायणी नदीत पिंपरी चिंचवड महानगरपरिषद हद्दीतून रसायन व मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने नदी पांढर्‍या फेसाने फेसाळली. आळंदीतील जलप्रदूषण वाढल्याने नागरिकांतून नाराजी वाढली आहे. तसेच, येथे देशभरातून येणार्‍या लाखो भाविकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण झालेला आहे.
आळंदीत इंद्रायणी नदीतून नगरपरिषदेच्या पाणी साठवण बंधार्‍यात प्रचंड प्रदूषित पाणी, जलपर्णीसह महापालिका हद्दीतून येत आहे. इंद्रायणी नदीवरील पाणी साठवण बंधारा अनेक ठिकाणी दगड निखळले आहेत. यामुळे गळती असून, सद्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न निकाली निघाला असला तरी नदीचे वाढते प्रदूषण तीर्थक्षेत्र विकासाची शोकांतिका उघड करीत आहे. देखभाल दुरुस्ती अभावी नदीवरील भक्त पुंडलिक मंदिर परिसरात पाणी साठविण्यावर बंधारा गळतीने मर्यादा आली आहे. येथील बंधा-यासह कोल्हापूर पद्धतीचे बंधा-याचे गळती रोखण्यासह पाणी पुरवठा केंद्राकडील बंधार्‍याची देखील देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून इंद्रायणी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्याची उपाययोजना करण्याची मागणी देखील भाविकांतून होत आहे. नदी प्रदूषण रोखण्याची मागणी देहू रानजाई प्रकल्पाचे प्रमुख सोमनाथ आबा यांनी केली आहे.
आळंदी हे महत्तवाचे तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षभर भाविक श्रींचे मंदिरात दर्शनासह तीर्थक्षेत्रातील स्नान महात्म्य जोपासण्यास येतात. आळंदीतून इंद्रायणी नदी वाहते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून नदीत थेट मैला व रसायन मिश्रित सांडपाणी सोडले जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिका सांडपाण्यावर प्रक्रिया न करता थेट नदीत सांडपाणी व रसायन, मैला, मिश्रित पाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषण प्रचंड वाढले आहे. बुधवारी इंद्रायणी नदी पांढर्‍या रंगाचे फेसाने पुन्हा एकदा फेसाळल्याने नदी प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याने आळंदीत नदी प्रदूषण वाढले आहे. वाढत्या जल प्रदूषणाने अलंकापुरीत भाविक व नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर घुंडरे पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्षाने इंद्रायणी नदीचे प्रदूषणात वाढ झाली आहे. नदीतील जलप्रदूषित करणार्‍या घटकावर गुन्हे दाखल करून कारवाईअभावी नदी प्रदूषण परिसरात वाढले आहे. आळंदीला पाणी पुरवठा केंद्रात येणारे पाणी देखील प्रचंड प्रदूषित असल्याने आळंदी नगरपरिषदेस अखेर भामा आसखेडच्या पाण्याची मागणी करून शुद्धीकरणावर यंत्रणेवरील ताण कमी करावा लागला.

Share This Article
Exit mobile version