किन्ही येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार

editor 1 Min Read
1 Min Read

पारनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील किन्ही , बहिरोबावाडी, गोरेगाव, करंदी आदी गावांच्या परिसरात गेली एक वर्षापासून बिबट्याचा वावर आहे. आतापर्यंत बिबट्याने पाळीव कुञे , कोंबड्या , शेळ्या , मेंढ्या तसेच मेंढपाळ बांधवांच्या घोड्यांना अनेकदा लक्ष्य केले आहे.  मागील वर्षी किन्ही येथे एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाने सुरक्षितरित्या बाहेर काढुन जंगलात सोडलेले आहे . तसेच गोरेगाव येथे देखील एका बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलेले आहे. परंतु तरी देखील या भागात अजुनही काहि बिबट्यांचा वावर असुन त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असुन , असेच बुधवारी रात्री किन्ही येथील भाऊसाहेब पांडुरंग खोडदे यांच्या शेळ्यांच्या गोठ्यामध्ये बिबट्याने घुसुन पाच शेळ्यांचा फडशा पाडला आहे. बिबट्याने एकाचवेळी पाच शेळ्या ठार केल्याने खोडदे परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे व यामुळे हे कुटुंब भयभित झाले आहे. सदर घटनेची माहिती शेतकरी नेते अनिल देठे पाटील,  किन्हीच्या सरपंच पुष्पा खोडदे यांनी तात्काळ वनविभागास देऊन सदर घटनेचा पंचनामा करून घेतला आहे. यावेळी शेतकरी नेते अनिल देठे पाटील यांनी वनविगाच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करण्याचे आवाहन केले आहे. या वेळी पंचनामा करण्यासाठी वनसंरक्षक निर्मला शिंदे , वनकर्मचारी दादाराम तिकोणे व पशुवैद्यकीय विभागाचे डॉ.शेळके , भाऊसाहेब खोडदे , बाळासाहेब नरसाळे , जयसिंग खोडदे आदी उपस्थित होते.

Share This Article
Exit mobile version