शिरुर अनंतपाळ (एस.आर. देशमुख) – लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यात १३२ के.व्ही.नवीन विद्युत केंद्र उभारणी संदर्भात गुरुवारी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची महावितरण व महापारेषणच्या अधिकाऱ्यासोबत मंत्रालयामध्ये महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली असून, यात सकारात्मक निर्णय झाल्याने अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहे. तालुक्यात शासकीय जागी नवीन १३२ के व्ही केंद्र स्थापन होवून लवकरच विजेच्या बाबतीत तालुका स्वयंपुर्ण होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी दिली आहे.
उच्च दाबाने विजपुरवठा होत नसल्याने तालुक्यात विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी तालुक्यात १३२ के.व्ही.केंद्राची उभारणी व्हावी, अशी मागणी तालुक्यातील जनतेतून केली जात होती. अखेर याला यश आले असून राष्ट्रवादीचे युवा नेते सुरज चव्हाण यांच्या पाठपुराव्यामुळे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी या संदर्भात मंत्रालयात महावितरण, महापारेषणचे संचालक, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व इतर संबंधित अधिकारी व युवा नेते सुरज चव्हाण यांच्या उपस्थितीत बैठक घेतल्याने १३२ के.व्ही.नवीन केंद्र उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, शिरूर अनंतपाळ तालुका निर्मितीला दोन दशक झाल्यानंतर ही विकास कामापासून वंचित आहे. यात वीज पुरवठा उच्च दाबाने होत नसल्याने लघु उद्योजक, व्यापारी, शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात १३२ के.व्ही.विद्युत केंद्र उभारून वीजेच्या बाबतीत होणारी सर्वांची हेळसांड टाळावी, या करिता तालुका निर्मितीपासून जनतेतून मागणी करण्यात येत होती. अखेर त्याला सुरज चव्हाण यांच्या पाठपुराव्याने यश आले आहे. राजमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी जागा पाहणीसह पुढील कार्यवाही सुचना केल्या असून, १३२ केव्ही विद्युतकेंद्र उभारणीमुळे वीजेची अडचण कायम दूर होणार आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्याला निलंगावरून विद्युत पुरवठा केला जातो. पण ३३ या केव्हीतून होणारा वीज पुरवठा शेवटपर्यंत उच्च दाबाने होत नसल्याने छोटे उद्योजक व शेतकरी परेशान झाले. यात अतिभारीत केंद्रावरील लोड मॅनेज करताना कर्मचाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत असल्यामुळे १३२ केव्ही विद्युकेंद्र निर्मिती करणे अत्यावश्यक असून राज्यमंत्री तनपुरे यांच्या माध्यमातून लवकरच सुरूवात होईल.
– सुरज चव्हाण, प्रदेश युवा कार्याध्यक्ष महाराष्ट्र

